मनोरंजन

मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचे भव्य स्मारक उभारणार: आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा.

Published

on

मंचर –
मराठी साहित्यविश्वाचा मानबिंदू आणि ज्येष्ठ कवयित्री कै. शांताबाई शेळके यांच्या स्मृती जपणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेल्या मंचर येथील ऐतिहासिक वाड्याच्या जागी त्यांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

​गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंचर येथील शांताबाई शेळके यांचा ऐतिहासिक वाडा अंशतः कोसळला. या घटनेवर दुःख व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ही केवळ एका जुन्या वास्तूची पडझड नसून मराठी साहित्याच्या एका जिवंत स्मृतीला बसलेला आघात आहे. आंबेगावच्या संस्कारांनी शांताबाईंच्या संवेदनशील मनाला आकार दिला आणि याच मातीतून मराठी साहित्याला असंख्य अजरामर कविता व गीतांची देणगी मिळाली.”



​शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करताना वळसे पाटील भावुक झाले. “महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शांताबाई माझ्या प्राध्यापिका होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या अध्यापनातील साधेपणा, साहित्यावरील नितांत प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता मी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे हा वाडा कोसळल्याचे वृत्त समजताच मन हेलावून गेले,” असे त्यांनी सांगितले.

​पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मृती
​यापूर्वीही अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रेक्षकगृहाला शांताबाई शेळके यांचे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. आता त्याच भावनेला पुढे नेत, वाड्याच्या जागेवर स्मारकाची उभारणी करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

​”हे स्मारक केवळ दगड-विटांची वास्तू नसेल, तर मराठी साहित्याला आयुष्यभर समृद्ध करणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. शांताबाईंचा शब्दवारसा आणि आंबेगावशी असलेले त्यांचे अतूट नातं पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version