सामाजिक
लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग काही तास बंद झाला.
मंचर- आंबेगाव तालुक्यात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण 98% भरले आहे.डिंभे धरणातून घोडनदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे लाखनगाव तालुका आंबेगाव येथील पुल पाण्याखाली गेल्याने बेल्हा जेजुरी महामार्ग बुधवारी सकाळी काही तास बंद झाला होता.
सध्या राज्यभरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येही चांगला पाऊस पडत असल्याने आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरण भरले आहे त्यामुळे घोडनदी पात्रात पाणी सोडले जात आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या घोडनदी भरून वाहू लागल्याने लाखनगाव येथील घोड नदी वरील पुल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.अनेक प्रवासी नदीच्या काठावर आल्यानंतर मार्ग बंद असल्याने पुन्हा मागे फिरवून जात आहेत.त्यामुळे वाहतूक खोळंबली.
जुना पूल कमी उंचीचा असल्याने या ठिकाणी नवीन पुल मंजुर होऊन या पुलाचे काम मागील काही वर्षापासून सुरू झाले आहे. परंतु अनेक दिवस या पुलाचे काम बंद अवस्थेत आहे. अर्धवट अवस्थेत असणारा हा पूल वाहतुकीस कधी पूर्ण होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थ व प्रवासी विचारत आहेत. नवीन पुलाची उंची जास्त असल्याने व पूलही रुंद असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूकीस अडथळा येणार नाही. परंतु नवीन पुलाचे काम रेंगाळल्याने प्रवाशांना जुन्या पुलाचा वापर करावा लागतो.
हा पुल पावसाळ्यात घोड नदीला पाणी सोडल्यावर अनेक वेळा पाण्याखाली जातो. तर इतर दिवसातही या पुलावर अपघात झाला तर अनेक वेळा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.
या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला होता असे खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रोडे पाटील यांनी केले आहे.