गावागावातुन
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार” जाहिर
मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार””जाहीर झाला आहे. राज्यातील २०२३-२४ गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची घोषणा आज (मंगळवार) संस्थेचे उपाध्यक्ष मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (दि. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेतर्फे साखर उद्योगातील दिल्या जाणा-या पुरस्काराचे वितरणही मा.श्री पवार यांचे हस्ते होणार आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण, कृषी निविष्ठांचा मोठया प्रमाणावर पुरवठा, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना ६ वेळा, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम क्रमांकाचा ४ वेळा, तांत्रिक कार्यक्षमता प्रथम क्रमांकाचा ९ वेळा, ऊस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा ५ वेळा, चाचणी गळीत हंगामात जास्तीत जास्त गाळपाचा १ वेळा, साखर उदयोगातील अग्रेसर संस्था भारतीय शुगर, पुणे यांचा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटीव्ह शुगर मील पुरस्कार” १ वेळा व दैनिक नवभारत वृत्तपत्र समूह प्रस्तुत दैनिक नवराष्ट्राच्या वतीने राज्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल “उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार” १ वेळा याप्रमाणे पुरस्कार मिळाले असून देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार ६ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.