गावागावातुन
प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.योग्य मोबदला देणार प्रशासनाची भुमिका.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक महामार्गासाठी आंबेगाव,जुन्नर, शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना योग्य माहिती नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना या संदर्भात माहिती मिळावी म्हणून संपर्क साधला होता. आणि त्यामुळे नामदार वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार सदर बैठकीचे आयोजन भीमाशंकर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आले होते. या महामार्गाबाबत येथील शेतकऱ्यांना चांगल्या स्वरूपाचा मोबदला द्यावा .शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी असे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले.
पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन भिमाशंकर कारखाना येथे करण्यात आले होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी (एम.एस. आर.डी.सी.) ए.आर.अरगुंडे, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे,एम.एस.आर.डी.सी.च्या वर्षा पवार, मंचर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक, जुन्नर चे तहसीलदार रविंद्र सबनीस, त्याचप्रमाणे भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील,रामदास वळसे पाटील,अनिल वाळुंज, बाळासाहेब घुले,बाळशीराम वाळूंज,गुरूदेव पोखरकर, अशोक वाळूंज,संदिप पोखरकर ,अशोक करंडे,विशाल करंडे ,कान्हु करंडे,बिपीन थिटे,बाळासाहेब औटी,प्रतिक जाधव,अशोक आदक,सुशांत रोडे, यांसह शिरुर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी एम एस आर डी सी चे अप्पर जिल्हाधिकारी ए.आर.अरगुंडे यांनी या महामार्गाविषयी माहिती दिली. पुणे नाशिक या ठिकाणी वाढत असलेल्या डेव्हलपमेंट मुळे शासनाने सदर मार्ग प्रस्तावित केला असून. शेतकऱ्यांना योग्य स्वरूपाचा मोबदला देण्यात येणार आहे .हा महामार्ग शंभर मीटर रुंदीचा असून येथील शेती व औद्योगिक मालाची वाहतूक करण्यासाठी या महामार्गाचा उपयोग होणार आहे. या महामार्गामुळे येथील शेतकऱ्यांचा विकास होणारा आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांसाठी सर्विस रोड ठेवण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असणाऱ्या वाटा,पायवाटा या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार आहे.
यामध्ये सहा ठिकाणी या मार्गावर जाण्यासाठी रस्ते ठेवण्यात आले आहेत. 2013 च्या कायद्यानुसार चारपट मोबदला शासन देणार आहे. तसेच महाराष्ट्र हायवे कायद्यानुसार शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य केले तर 25% अधिकचा मोबदला मिळणार आहे. त्यामुळे योग्य मोबदला येथील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.तसेच झाडे, विहिरी, बोर, मंदिरे ,गोठे ,घरे, पाईपलाईन या सर्वच गोष्टीसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच पट मोबदलाही शासन देणार आहे.जिरायती साठी पाच पट, हंगामी बागायतीसाठी साडेसात पट,बारमाही बागायतीसाठी दहापट मोबदलाही शेतकऱ्यांना मिळणार आहे.प्रत्येक गटाचा मोबदला त्या गटाच्या आकारणीनुसार ठरेल.असेही यावेळी अरगुंडे यांनी सांगितले.
यावेळी या महामार्गाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, यांनीही शेतीमालाला या मार्गाचा उपयोग होणार असून या महामार्गामुळे परिसराचा विकास होणार आहे असे म्हणाले.यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की महामार्गाच्या परिसरात लघु उद्योगांसाठी शासनाने प्रकल्प उभा केला पाहिजे त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात या महामार्गावर जाण्यासाठी सोय करावी येथील शेतकऱ्यांच्या पाठीमागे नामदार वळसे पाटील कायमच उभे राहतील असे या वेळी विवेक वळसे पाटील म्हणाले.