महाराष्ट्र

भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३” व “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहिर

Published

on

निरगुडसर (राजु देवडे)
दत्तात्रयनगर ( पारगाव तर्फे अवसरी बु,) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३” व मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहीर झाले आहे. राज्यातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवार घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असून पुरस्काराचे वितरणही श्री. पवार यांचे हस्ते गुरुवार (दि. ११) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बेंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळते भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३ करिता निवड झाली आहे.
तसेच मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर, साखर उत्पादन प्रक्रीयेमध्ये बगॅस वापर कमी आहे. गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत, साखरेच्या व्येयामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २६ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version